Monday, November 24, 2008

अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती


'हॅरी पॅटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे।के।रोलिंग यांनी जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 'अपयशाच्या'फायद्यावर प्रकाशझोत टाकुन विद्यार्थ्यांना एक नवा कानमंत्र दिला॥हा कानमंत्र प्रत्येकासाठी बहुमोल ठरणारा आहे।म्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहे।पदवी घेतल्यानंतर लेखिकेचे सात वर्षे ही महाप्रचंड अपयशाची होती॥त्याबाबत सांगतांना त्या म्हणाल्या-
*अपयश म्हणजे अनावश्यक गोष्टी बाजूला सारणे।मी जी काही आहे त्यापेक्षा वेगळी कोणी आहे,असा आव आणायचे मी थांबवले आणि मग मी माझी शक्ती ज्या कामाचे मला महत्व वाटत होते त्या कामामध्ये ओतायला सुरवात केली।तुम्हाला बसलेल्या फटक्यांमधून तुम्ही अधिक शहाणे,अधिक कणखर होऊन उभे राहता,हे समजणे महत्वाचे आहे।त्यामुळे तुम्ही तुमच्या तगून राहण्याच्या क्षमतेवर विसंबून राहू शकता।तुम्ही प्रतिकुलतेचा सामना जोवर करत नाही तोवर तुम्ही स्वत:ला ओळखु शकत नाही आणि तुमच्या नातेसंबंधांची ताकदही पणाला लागत नाही.मी जेवढ्या प्रमाणात अपयशी ठरले तेवढे तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही।पण कुठेतरी अपयश घेतल्याखेरीज जगणे अशक्य आहे।तुम्ही सावधपणेच जगायचे ठरवले-अपयश येऊच नये,याचा आटोकाट प्रयत्न करत राहिलात,तर ते जगणे म्हणजे अपयशीच होणे।परीक्षांमध्ये पास होऊनही जी आंतरिक सुरक्षितता मला मिळाली नव्हती ती मला अपयशातुन मिळाली.*आयुष्य अवघड असते आणि गुंतागुंतीचे असते,शिवाय ते कोणालाच पूर्णपणे ताब्यात ठेवता येत नाही,हे समजण्याइतकी नम्रता तुमच्याजवळ असली तरी तुम्हाला आयुष्याच्या प्रवाहात तरता येईल.*या ग्रहावरच्या इतर कोण्त्याही प्राण्याकडे नाही अशी क्षमता आहे.माणूस प्रत्यक्ष अनुभव न घेताही शिकू शकतो.दुसर्‍या माणसाच्या मनात शिरुन त्याला विचार करता येतो;दुसर्‍या जागी स्वत्:ला कल्पिता येते. अर्थातच ही एक शक्ती आहे.माझ्या कल्पित कथांच्या जादुई मुद्रेसारखी;नैतिकद्रुष्ट्या तटस्थ असलेली.अशी शक्ती तुम्ही जग समजून घेण्यासाठी,सहानुभूतीसाठी वापरु शकता,तशीच ती परिस्थिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तशी वाकवून घेण्यासाठीही वापरु शकता.*जग बदलण्यासाठी आपल्याकडे जादूची कांडी असावी लागत नाही.आपल्याला आवश्यक असणारी ताकद आपल्या आत असतेच.आपल्याजवळ असते ती अधिक चांगली कल्पना करु शकण्याची ताकद
* जशी कथा असते तसेच जीवन असते।तिथे लांबी महत्वाची नसते,तर ते किती चांगले आहे हे महत्वाचे असते .

भावनांचा खेळ

सहजचं
आयुष्यात खुप सोसलं ना की मग कोणत्या गोष्टीत रस वाटत नाही॥कशाचे अप्रुप वाटत नाही।जे आलयं ते जगायचं जे जातेय ते जाऊ द्यायचे..का होते असं ? मानवी मन हे विविध भावभावनाच्या हक्काचे ठीकाण.मग असं का होते..या भावनाच त्या माणसाला नकोशा होऊन तो भावनाहीन आयुष्य जगण्यातच सुख आहे असे का मानायला लागतो? सुख आणि दु:ख देणार्‍या अशा दोनच भावना असतात.त्यात सुखाच्या भावना मानवी मनाला आनंद देतात तर दु:खद भावना तडफडवितात.तुम्ही कसे जगता यावर खर तर तुमच्या सुख-दु:खाची गणित ठरतात असे मला वाटते.तुम्ही येणार्‍या प्रसंगाला कसे सामोरे जाता,त्याचा कसा सामना करता यावरुन तुमच्या भावनांची गोळाबेरीज करता येईल.मन हे चंचंल असते.त्या मनावर ताबा ठेवणे हाच उपाय भावनांवर आहे. आयुष्य जगतांना आपल्याला हवे ते मिळतचं असे नाही.कधी कधी जगतांना नको असलेल्या गोष्टी गोड मानुन जगावं लागते आणि एकदिवस ती नको असलेली गोष्टच आपली आवडती होऊन जाते.माणसाचे आयुष्य असेच आहे.माणुस हा प्राणी जगाच्या कोण्त्याही कोपर्‍यात जरी नेऊन ठेवला तरी तो कालांतराने त्या ठीकाणी रममाण होऊन आनंदात जगतांना दिसेल.आपल्या जवळची व्यक्ती मरण पावली तर त्याचा शोक काही दिवस करणारा माणुस पूर्ववत आपले जीवन हळूहळू जगायला लागतोच ना..!कारण माणुस हा परिस्थितीप्रमाणे जगणारा प्राणी आहे.आणि हीच मानवाची खरी ताकद आहे.आयुष्यात दु:ख असल्याशिवाय आपल्याला आनंदाचा आस्वाद घेता येत नसतो.जगायचं खुप खुप वेदना आयुष्याने दिल्या असल्यातरी आपल्या भावनांना पुलकीत ठेवायचे..उत्साही ठेवायचे..बघा मग आपल्याला दु:खातही आनंदाची प्रचिती येतेच...!!

Friday, November 21, 2008

तो..

आज रस्त्याने जातांना त्याची न माझी जिथे पहीले भेट झाली ते ठीकाण नकळत वाटेत लागले अन मनात चर्रर्र झालं.इंग्रजीचा क्लास लावायचा म्हणून भेट झाली अन ती भेट आयुष्यात नवचैतन्य घेऊन आली.आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी आपल्या हक्काचं आपलं माणूस आहे,ही कल्पनाच किती मनाला सुखावुन टाकणारी असते ना..मी प्रेमात पडले मग आमच्या भेटी-गाठी,मनसोक्त फिरणे,बागडणे,धुंद पावसाच्या सरीत दोघांचे चिंब भिजणे,मस्त खडकवासला येथे गरम-गरम भज्यांवर ताव मारुन भविष्याच्या स्वप्नात दंग होऊन जाणे..कधी भांडण तर कधी रुसवा-फुगवी..अथात यात माझा सहभाग प्राधान्याने असायचा..मग तो मला जेव्हा लडिवाळपणे समजुन सांगायचा..माझी मनधरणी करायचा तेव्हा माझ्या अंगावर मुठभर मास चढायचं..!!तेव्हा तो म्हणायचा मी तुला समजुन घेतो..तुझ्यावर खुपखुप प्रेम करतो म्हणुन तु मला इमोन्शली ब्लकमेल करते..मी दुर गेलो की समजेल तुला माझी किंमत..!! मी त्याच्या या बोलण्याकडे दूलक्ष करीत फक्त हसायचे..तु काय जाणार मला सोडून म्हणून मी पण त्याची गंमत करायची.तेव्हा तो गालातल्या गालात स्मित करित म्हणायचा बघ हं खरचं जाईल..त्याचे ते शब्द मला पायाखालुन जमीन सरकल्यासारखे वाटले..अन मी रडायला लागलाच मला जवळ घेऊन अग राणी..गंमतीने म्हटलं तुला अन तु वेड्यासारखी रडायलाच लागली.तु माझा श्वास आहे..श्वास कधी शरीरापासुन वेगळा राहू शकेल काय..!काही झालं तरी तुला अन मला कोणी दुर करु शकणार नाही.अगदी तो परमेश्वरसुध्दा नाही.त्याच्या या बोलण्याने धिरावलेली मी त्यावेळी नकळत त्याच्या कुशीत स्वत:ला झोकुन द्यायची..प्रेम आहे शेवटी..प्रेमाची ऊब स्वर्ग आनंद देऊन जातो.मलाही तोच आनंद त्याच्या सहवासात मिळायचा..पण दैव कुणी जाणले..ज्याचेसाठी आपले सर्वस्व मी वाहीले तो माझा प्रियकर आज त्याच्या पत्नीसोबत सुखाचा संसार करतो आहे..त्या सर्व शपथा,ती सर्व वचने,ते सर्व क्षण जे आम्ही सोबत घालविले ते सगळे विसरुन.....दुसरीची ओंजळी भरुन माझी ओंजळी रिती ठेवली...त्याने ज्याला मी माझं सर्व मानले.
विरह शब्दात कसे सांगु,
शब्दच झाले मुके
तुझ्याविन जीवनाचे,
रंग झाले फिके।
ह्रदयात साठल्या,
आठवणी कोवळ्या
अश्रूत वाहील्या,
प्रितीच्या पाकळ्या
ह्रदयात सागर हा,
शांत जरी बसतो
वेदनांच्या लाटेसंगे,
अंतरी घुसमुटतो.

गीत - मंगेश पाडगावकर


श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा


जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा


रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा


पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा



मंगेश पाडगावकर



कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे

डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे


बहर धुंद वेलीवर यावा

हळुच लाजरा पक्षी गावा

आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने

भान विसरुनी मिठी जुळावी

पहाट कधि झाली न कळावी

भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे


हळुच फुलाच्या बिलगुनि गाली

नाजुक गाणी कुणी गायिली

आता उरली आर्त विराणी सूरच केविलावाने

जुळली हृदये, सूरहि जुळले

तुझे नि माझे गीत तरळले

व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरुन आता जाणे


गीत-
मंगेश पाडगावकर
संगीत-यशवंत देव
स्वर-सुधीर फडके
राग-मिश्र किरवाणी (नादवेध)


मिळुनी सार्‍याजणी मासिकातील एक कथा

कहाणी - एका ह्रदय कुटुंबाची



परिवर्तनात छोट्या छोट्या व्यक्तिगत योगदानाचं खूप मोल असतं.सामान्य माणसातील असामन्यत्त्वाचा हा दिलासा-मानवी मन हे अनेक कप्प्यांचे बनलेले असते. म्हणूनच कोणत्या समस्येच्या वेळी त्याच्या मनाची प्रतिक्रिया कशी होईल याचा अंदाज करणे कठीण असते. पूर्वीच्या काळी सावत्र नात्याची काळी बाजूच लोकांपुढे यावयाची आणि ती पुष्कळदा खरीही असायची. त्यातील प्रमुख कारण म्हणजे खऱ्या शिक्षणाचा अभाव. खरे शिक्षण जे मन विशाल करते व विचारांना चालना देते. माझ्या एका परममित्राच्या कुटुंबाची ही कथा आहे. ह्या कुटुंबाने एका परप्रांतीय सुनेचा तिच्या लहान मुलीसकट स्वीकार केला व तिला व तिच्या मुलीला आपले मानले. माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर त्यांच्या ह्या कृतीमुळे अनेक पटींने वाढला.मी व माझे हे मित्र, केंद्रसरकारच्या एकाच खात्यात नोकरीला होतो. दोघांचीही घरची परिस्थिती अगदी बेतासबात. मित्राच्या वडिलांना लोक `शास्त्रीजी' म्हणूनच संबोधायचे. माझे हे सहकारी तीन भावंडातील एक होते. त्यांना स्वत:ला एक मोठी मुलगी व एक धाकटा मुलगा. मुलीचे शिक्षण आटोपल्यावर तिला चांगली नोकरी लागली व यथावकाश तिचे लग्नही झाले. मुलगाही चांगला सी.ए./एम.बी.ए. पर्यंत शिकला पण त्याचे मन नोकरीत कधीच रमले नाही, त्याला स्वतंत्रपणे काही करायचे होते. त्या दिशेने त्याची सतत धडपड चालू होती. सुदैवाने त्याला एक भागीदार मिळाला व त्याच्याबरोबर साथीदारीत त्याने वाणिज्य विषयाचे खाजगी शिकवणीवर्ग चालू केले. त्यातील चड-उतार पार करून हळूहळू चांगला जम बसवला. व्याप खूपच वाढला व थोड्याच वर्षांत हे वर्ग नावारूपाला आले. मित्रानेही मुलाला आपल्या भविष्य-निर्वाह निधीतून पैसे काढून वेळोवेळी मदत केली.थोडी स्थिरता आल्यावर मुलाचे लग्न झाले. सूनही मुलाच्याच म्हणजे वाणिज्य शाखेचीच पदवीधर होती. पण थोड्याच कालावधीत मुलांत व सुनेत काही कारणामुळे विसंवाद उत्पन्न झाला. मित्राने व त्याच्या सोशिक पत्नीने दोघांत सलोखा करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग न होता प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पण अशाच प्रसंगी माणसाच्या धैर्याची खरी परीक्षा होते व त्यातून मार्ग काढण्याचे आंतरीक बळ देते. मित्र त्यातून सावरला. यथावकाश तो नोकरीतून निवृत्त झाला. आणि अचानक एक दिवस आम्हाला बातमी कळली की मुलाचे पुन्हा लग्न झाले आहे. फक्त लग्न झाल्याचेच सुरुवातीला कळले. नंतर कळले की आधीच्या लग्न संबंधातून नवीन सुनेला एक लहान मुलगीपण आहे व ही सूनही प्ररप्रांतीय आहे. थोडे आश्चर्यच वाटले. १/१ ।। वर्षाच्या कालावधीत मला जाणवले की नवीन सून आणि नात, ही मित्राच्या घरात पूर्णपणे रुळली आहेत व त्यांच्या घरचीच झाली आहेत. हे चित्र पाहिल्यावर आम्हांला आमच्या मित्राचे व विशेष करून वहिनीचे खूप कौतुक वाटले. नात १ ।। वर्षाची असतानाच त्यांना नातू झाला. आता नात आणि नातू यांचा संभाळ, आजी-आजोबा, कोणताही भेदभाव न करता आनंदाने करीत आहेत. मुलगा व सून आपले क्लास व इतर उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत.मला ह्या मित्राचे व वहिनींचे अपार कौतुक वाटते. त्यांनी मुलाला घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरताना मानसिक आधार तर दिलाच, पण मुलाच्या सुखाचा विचार करून त्याने पसंत केलेल्या परप्रांतीय सुनेचा, तिच्या लहान मुलीसह आनंदाने स्वीकार केला. मनाचा मोठेपणा असल्याशिवाय असा स्वीकार करणे शक्यच झाले नसते. असा स्वीकार करताना त्यांच्याही मनात अनेक विचारांची, शंका-कुशंकांची आवर्तने नक्कीच उठली असतील. पण मुलाचे सुख तेच आपलेही सुख हाच विचार शेवटी प्रबळ ठरला असणार. जेव्हा-जेव्हा नात आणि नातवाला मित्राबरोबर बघितले तेव्हा-तेव्हा ते दोघांवर समान माया करतांना दिसले. नात परक्याची अशी भावना त्यांच्या वागण्यात आम्हांला कधीही आढळली नाही. मित्राच्या सद्गुणाचा हा पैलू माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला. आजच्या स्वयंकेद्रित कुटुंबव्यवस्थेत या कुटुंबाची चांगुलपणाची ही हकिकत वाचून आणखी काही जणांच्या हृदयातही माझ्यासारखीच ज्योत लुकलुकली तर ही हकिकत लिहिण्याचे सार्थक झाले असे मला वाटेल.

मिळुनी सार्‍याजणी मासिकातील सचिन कुंडलकर लिखित लेख.

शरीर....
स्वत:च्या आत डोकावून बघत, स्वत:ची ओळख करून घेणं सोपं नाही; पण स्वत:चं शरीर? त्याच्या साऱ्या उंचसखलतेसह, त्याच्या विविध पोतांसह साऱ्या हळव्या, नाजूक कानाकोपऱ्यांसह कधी बघतो आपण? न्याहाळतो? नाही। बहुधा नाहीच।या लेखातल्या शब्दांचं आणि संवेदनेचं बोट धरून चालणार? बाहेरून बघता बघता आतपर्यंत पोचण्याची कळ सापडू शकेल.माझ्याबरोबर आयुष्यभर प्रवास करणारं, वेदना आणि आकर्षण निर्माण करणारं शरीर. माझं आणि माझ्यासमोर येणाऱ्या अनेकांचं.तीळ, लव, जन्मखुणा, हजारो-लाखो रंध्र, पोकळया. नितळ आणि केसाळ. उंच, सपाट, थुलथुलित. बलदंड आणि पुष्ट. सौम्य पापुद्र्याच्या कांतीचं आणि राकट जाडंभरडं.शरीरावरची वळणं, शरीरावरचे उंचसखल, मऊ आणि विस्तीर्ण प्रदेश गुहा त्यातून सातत्याने वाहणारे अनेकधर्मी स्राव. प्रत्येक शरीराचे आपापले गंध. अगदी स्वत:चे एकाच शरीरातले त्वचेचे असंख्य पोत. कानाच्या पाळीच्या मऊ आरक्त त्वचेपासून टाचांवरचे खरबरीत पोत आणि नखं जिथे फुगीर त्वचेला मिळतात तिथले गादीसारखे पोत.माझ्या शरीराची आणि माझी नीट ओळखही नाही. सूक्ष्मातून मी त्याच्याकडे पाहिलेलं नाही. जगण्याच्या व्यापामध्ये तसं काही करत बसलेलं कोण आहे?त्यातून आपलं संपूर्ण शरीर बघण्याची मानवी डोळयांपाशी प्रतिभा नाही आणि दुसऱ्याचं संपूर्ण शरीर काही तीव्र आकर्षणे आणि ठोस कारणं याशिवाय बघण्याची सुसंस्कृत मानवाची रीत नाही.एरवी मी नीट बघतो ते फक्त चेहऱ्याकडे. माझ्या किंवा इतरांच्या.मग काही दुखलं, खुपलं, सुजलं तर इतर भागाकडे; पण फारच पिचत.शरीर नश्वर आहे. शरीरविचार उथळ आहे, शरीर हे फक्त साधन आहे, नग्नता अश्लील आहे हे सगळं माझ्या मनाच्या आत, मला न विचारता कुणीतरी लिहून ठेवलं आहे.पण एकदा मी जमिनीखाली खोलवर गेलो असता पाणी, प्रकाश आणि उदंड नग्न शरीरं यांच्या समुच्चयातून मला आलेला हा बेभान अनुभव.मी विनाकारण दूरच्या प्रवासाला निघून जातो. तेव्हा अनेकदा माझं मन गोठून गेलेलं असतं. कधीतरी संपून दुसरं काहीतरी सुरू होण्याच्या मध्ये असलेली ही अवस्था. तेव्हा फार बोलावसं वाटत नाही. मन अकारण शांत, शहाणं बनतं आणि दिवसाचा बराच वेळ आजूबाजूच्या गोष्टींना सौम्य प्रतिसाद देण्यात जातो. अशा वेळी मी कशालाच फारसा प्रतिकार करत नाही; पण अनोळखी प्रदेशात आणि बिनहक्काच्या माणसांमध्ये अशा वेळी राहणं सोपं वाटतं.माझ्या सुदैवाने मनाच्या रिकाम्या, गोठलेल्या अवस्था आणि असे लांबलांबचे प्रवास माझ्या छोट्याशाच आयुष्यात पुष्कळ आले आहेत.अर्धवट झोपेतून जाग येते तेव्हा बस ऑस्टि्न्या आणि हंगेरीमधल्या चेकपोस्टवर थांबलेली आहे. अंग आखडून गेलंय. गेला संपूर्ण दिवस बसमध्ये एकाच सीटवर बसून राहिल्यानं आंबल्यासारखं झालं आहे. हे पारोसेपण आणि शिळेपण निवांत सुटीच्या दिवशी घरबसल्या फार हवंहवंसं वाटतं; पण प्रवासात ते अचानक नकोनकोसं होतं.अजून पाऊण तासाने बुडापेश्त. काहीच घडत नाहीये म्हणून इतर चारदोन जणांबरोबर मी खाली उतरलो. बसचा ड्नयव्हर आणि हंगेरियन कस्टम अधिकारी यांची माग्यार या अगम्य भाषेमध्ये लांबलचक चर्चा चालू आहे. मला भयंकर भित्या अशा दोनच आहेत. एक म्हणजे साप आणि दुसरी- मी लघवीला गेल्यावर बस निघून जाईल ही.नेहमीप्रमाणे तसं काही न होता मी पुन्हा बसमध्ये येऊन बसतो.हे साल आहे २००४. युरोपमधली बडी राष्ट्न्ं एक होऊन युरोपिअन युनियन तयार झाली आहे. आर्थिक फायदा होणार; पण तो नक्की कुणाला? हे कळलेलं नाही. देशांमधील कुंपणं पडली आहेत आणि लोंढ्याने माणसं इकडून तिकडे फिरतायत; पण त्यात फ्रान्सचं फ्रान्सपण जातंय आणि जर्मनीचं जर्मनत्व. सांस्कृतिक सपाटीकरणाचं लाटणं नकळत फिरायला लागलं आहे. हंगेरी बिचारा हा महासत्तेत सामील होण्याची वाट बघत दाराबाहेर उभा आहे. त्याचा अर्ज आत मंजुरीसाठी पाठवला गेला आहे.बसस्टँडवर टेलिफोन बूथपाशी मला दिसतो जिप्सी मुलींचा थवा. रुंद चेहऱ्याच्या, फुलाफुलांचे झगे घातलेल्या आणि डोक्याला रुमाल गुंडाळलेल्या रुमाननिअन जिप्सी. शांत, थंड बसस्टँडवर त्यांनी नुसती कलकल माजवली आहे. कानांतले मोठे डूल जोरजोरात हलवत आणि टीपेच्या स्वरात खिदळत त्यांचं काय चाललंय कोण जाणे.विल्यम मला न्यायला येतो. हा माझा अमेरिकन मित्र. बुडापेश्तच्या युनिव्हर्सिटीत इंग्रजी शिकवणारा. त्याच्यामागोमाग मी त्याच्या घरी चालू लागतो. जमिनीखाली शिरून दोन-तीन ट्न्ेन्स बदलून मग जमिनीवर पुन्हा सूर्यप्रकाशात.जमिनीखाली आता अनेक शहरं आहेत. सर्व देशांमध्ये. इथे रेल्वे धावतात, दुकानं आहेत आणि अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये करण्याजोगे सर्व काळे व्यवहार. जमिनीखाली गेल्यावर माणूस नकळत थोडं कमी बोलतो. इथली हवा दाट असते आणि आकाश नसतं. मला अनेकवेळा जमिनीखालच्या ट्न्ेन्सने प्रवास करताना आपल्या डोक्यावर अख्खं शहर धावतंय याची विस्मृती होते आणि मग त्या प्रवासाचा अर्थच कळेनासा होतो.विल्यम एका वाड्यामध्ये राहतो. चक्क पुणेरी वाडा. तळमजल्यावर खडूस मालक. घराची दारं उघडी टाकून उंबऱ्यात शिवणकाम करत आल्यागेल्यावर नजर ठेवणाऱ्या हंगेरियन आज्या. अरुंद लाकडी जिना. मग एका तितक्याच अरुंद बोळकांडीतून चालल्यावर विल्यमच्या दोन खोल्या. त्याच्या दारात झगझगीत पिवळया फुलांचं झाड.मग तो सगळा दिवस त्या अजब शहरात आम्ही पाय तुटेस्तोवर भटकतो. या पूर्व युरोपियन देशांमध्ये मध्येच एक प्रकारचा `मेटॅलिक कोल्डनेस' जाणवतो. भव्य इमारती, भव्य रस्ते; पण त्या वास्तुरचनेत एक अलिप्त कोरडेपणा. बहुधा धाकच. तरी फ्रँकफर्ट किंवा न्यूयॉर्क सारखं हे शहर धावणारं नाही. घड्याळयाच्या काट्याला बांधलेलं नाही.विल्यम दिवसभर आज्ञाधारक गाईडसारखा मला शहराची माहिती देतो. काही वेळाने आम्ही दमून एका टेकडीवरच्या हिरवळीवर पडून आकाशाकडे बघत राहतो.एका विस्तीर्ण पटांगणात पडदा टांगला आहे. समोर पन्नास शंभर बाकडी टाकली आहेत. जुन्या मूकपटांचा शो चालू आहे. फारशी गर्दी नाही. मी आणि विल्यम पहिल्या ओळीत बसलो आहोत. अगदी पडद्यापाशी. मी समोरची भराभर चालणारी पात्रं आणि त्यांचे मोठ्ठे मोठ्ठे मूक चेहरे बघतोय. मोठ्ठे डोळे करून सतत बडबडणारे. काही वेळानंतर माझ्या डोळयांसमोर वेगळीच दृश्यं दिसायला लागतात. एकामागून एक मूकपट चालू राहतात. संगीत नाही की काही नाही. टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता.मग मी विल्यमशी बोलायचं ठरवतो. मग आम्ही बोलतो. बोल बोल बोलतो. एवढं की सकाळच होते.आणि सकाळी पुन्हा पारोसेपणाचा पापुद्रा चढलेलं माझं शरीर. मी बाथरूमच्या दिशेने जाताना विल्यम मला थांबवतो.डगडग चालणाऱ्या ट्नममध्ये बसून आम्ही जुन्या बुडाकडे चाललोय. डॅन्यूब नदीचं विस्तीर्ण पात्र ओलांडून एका गल्लीवजा भागातल्या स्टॉपवर आम्ही उतरतो. घंटा वाजवून ट्नम पुढे निघून जाते.गल्लीच्या टोकाशी एका जुन्या गढीसारखी एक इमारत आहे. तिच्या दिशेने मी विल्यमच्या मागून चालायला लागतो.त्या इमारतीच्या अंगणात एक मोठा काचेचा घुमट दिसतो. जमिनीवर बांधलेला. घुमटाच्या चारही बाजूंना दगडी खांब. एका खांबाला वळसा घालून मागे जावं तर एक काचेचं दार. ते दार उघडून विल्यम आत जातो आणि जमिनीच्या पोटात नेणाऱ्या एका वळसेदार जिन्याची एक एक पायरी मी त्याच्यामागून उतरायला लागतो. जमिनीवरचा प्रकाश कमी कमी होत जातो आणि सोनेरी दिव्यांनी उजळलेल्या जमिनीच्या पोटातल्या एका वाड्यात आम्ही पोचतो.ते एक सार्वजनिक स्नानगृहं आहे. बाथ हाऊस.जमिनीखालील एका अतिउष्ण पाण्याच्या जिवंत स्रोताला वेगवेगळया पद्धतीने बांध घालून हौद तयार केले आहेत. त्या हौदांमधल्या पाण्याचं तापमान आवश्यकतेप्रमाणे गार पाणी सोडून नियंत्रित केलं आहे. आज मंगळवार आहे. फक्त पुरुषांचा दिवस. तळघरातल्या कपाटामध्ये कपडे ठेवून आत जायचं आहे. संपूर्ण विवस्त्र.खोलीत पोचल्यावर मी एका कोपऱ्यात घुटमळत उभा राहतो. विल्यम अंगावरचा एक एक कपडा काढायला लागतो. माझं शरीर इतक्या मोकळेपणाने घेऊन वावरायची मला सवय नाही. मी कुणासमोर पटकन कपडेसुद्धा बदलू शकत नाही. मी शहरातल्या सुरक्षित आणि कप्प्यांच्या वातावरणात वाढलो आहे. कारण नसताना काही पुरुष कपडे काढून दंड दाखवत फिरतात. तशी काही कमाई मी केलेली नाही. संपूर्ण विवस्त्र होण्याची माझ्या मनाची तयारी नाही. विल्यम अंगावरचे सर्व कपडे काढून नग्नावस्थेत चालत जातो. माझा संकोच बघण्यातही तिथे कुणाला रस नाही. मी खोलीत एकटा उरलो आहे हे बघून मी अंगावरचा एक एक कपडा उतरवायला लागतो. अतिशय धैर्याने शेवटचा कपडा उतरवून मी कपाट बंद करतो आणि खोलीबाहेर चालत जातो. चेहऱ्यावर ठेवता येईल तितका शांतपणा.स्नानघराचं दार उघडल्यावर दाट धूसर वाफेच्या पडद्यापलीकडे अनेक शरीरं दिसतात. संपूर्ण नग्न. उष्ण पाण्याच्या तीन-चार हौदांमध्ये काही जण पडून आहेत. काहीजण काठावर ठेवलेल्या बाकांवर बसून आहेत. सगळीकडे एक ओलसर स्वच्छता आहे आणि अवकाशयानात असावी तशी शांतता. नागड्या शरीराने आत गेल्यावर आत सगळे फक्त आपल्याकडेच बघणार हे मला नक्की माहीत आहे. त्यामुळे माझी नजर खाली; पण कुणीच कशाची दखल घेताना दिसत नाही.पेटीसारख्या बाथरूममध्ये घरी केलेली बादलीतल्या पाण्याची अंघोळ, हॉटेलमधल्या माफक टबात अंग बुचकळून केलेली अंघोळ, नद्यांमधलं पोहणं, समुद्रात केलेली मस्ती आणि एकदा कोकणातलं शूटिंग आटपून परत येताना घाटामध्ये प्रचंड धबधब्याखाली शरीर बधिर होणं. अंघोळीबरोबरचे रंगीत साबण, शॅम्पू आणि क्रिम्स. शरीर स्वच्छ करायला आणि मनावर पाणी टाकून त्याला जागं करायला.एका कोपऱ्यात उभं राहून इकडे तिकडे बघत मी विल्यमला शोधतोय.स्नानगृहाच्या मध्यभागी सर्वांत गरम पाण्याचा हिरवट निळा विस्तीर्ण तलाव आहे. वाफा तिथून येतायत. त्या तलावाच्या बरोब्बर वरती मगाशी जमिनीवर पाहिलेला काचेचा घुमट.त्या दमट अंतराळामध्ये मी आता उरलेलं जग हळूहळू विसरून जायला लागतो आणि माझी पावलं मला त्या गरम प्रकाशमान तळयाकडे न्यायला लागतात.पुरुषांचं शरीर. उंच, सपाट, रेखीव. वर्तुळांपेक्षा रेखारेखांनी आकर्षक होणारं. अनवट जागी बलस्थळं. रूक्ष कोरड्या त्वचेवर भुरभुरत उगवणारे केसांचे समूह. काही शरीरभाग बालपणीइतकेच नाजूक. काही पुष्ट- बेफिकीर. अस्वस्थ हालचाल करत राहणारे गळयाचे उंचवटे. मनाची उलघाल ऐकताच मान वर करणारं लिंग. दाढीने झाकून लपले नसतील तर हिरवट सोललेले गाल. किंचित निष्काळजी नखं आणि लाखो रंध्रांमधून घामामागून वाहणारा लिंबाच्या सालीचा पुरुषगंध. कधी भाजलेल्या मडक्याचा, कधी कडीकुलपातल्या बंद भुयाराचा.काही क्षण वेळ माझ्यासाठी थांबून राहतो. अंगठ्यापासून छातीपर्यंत ते उष्ण गंधकमिश्रित पाणी मला वेढून टाकतं हळूहळू.त्या सर्व नग्न शरीरांच्या गर्दीत मी माझ्या शरीराचा संकोच आपोआप विसरून जातो आणि हळूहळू एकेका शरीराकडे बघायला लागतो. वाफेच्या उष्म्यामुळे एक जड निश्चलता माझ्या शरीरावर हळूहळू सरपटायला लागते आणि एका अर्धवट ग्लानीत माझं मन तरंगायला लागतं.ह्या सगळया वातावरणाला, त्या अद्भुत दृश्यांना माझ्या आजपर्यंतच्या अनुभवांशी जुळवून बघताच येत नाही. वेगळाच ग्रह उगवलाय असं वाटतं.फक्त शरीर घेऊन वावरताना एक मस्त मोकळेपणा जाणवतो आणि मी त्या परग्रहावरच्या अनिर्बंध व्यवहारात स्वत:ला झोकून देतो.आपण सुंदर आहोत याची जाणीव काही माणसांना असते. त्या बिचाऱ्यांवर मग फार जबाबदाऱ्या पडतात; पण ज्यांना ती जाणीवच नाही. अशा सुंदर माणसांना बघण्याइतकं मोहक काहीही नाही. पाणी आणि बाष्पामुळे ओलसर निथळती प्रकाशमान शरीरं थोडी तीव्र दिसतात.पायऱ्यांवरील एका कोपऱ्यात अंग दुमडून बसलेला एक म्हातारा, शून्यात टक लावून बसलेला दणकट काळसर त्वचेचा एक भाबडा चेहरा, स्वत:च्याच दंडाकडे पुन्हा पुन्हा रोखून बघणारा एक कोवळा तरुण. सगळे आपापल्यात. ध्यानसाधनेला आल्यासारखे मग्न. या सगळयांना मी न्याहाळत असता मलाही कुणी बघत असेल ही जाणीव मनातून संपूर्णपणे गेलेली.विल्यम बाष्पस्नान घेत एका पायरीवर पहुडला आहे. त्याचा फक्त चेहरा ओळखीचा वाटतो; पण तो नाही. आजपर्यंत मी त्याला पाचपन्नास कपड्यांतच पाहिला आहे. मी माझे पाय उचलून त्या तळयामध्ये हळूहळू पोहायला लागतो आणि समोरच्या काठावर जाऊन पाण्याच्या आवरणातून बाहेर पडून मोकळेपणानी पायरीवर पडून राहतो.एवढी नागडी शरीरं याआधी मी फक्त ब्लू फिल्म्समध्ये पाहिली आहेत; पण ती सगळी व्यायामी मापात बसणारी शरीरं. शिवाय वखवखलेली. ब्लू फिल्ममधल्या जगाला असणारा वेग इथे नाही. गंधकाच्या सौम्य वासाने आणि वाफेच्या आवरणाने इथल्या हालचाली संथ-दबलेल्या आणि आवाजही फिक्कट. या सगळयाला साजेसं संगीत वाजवायचं झालं तर ते कोणतं असेल?रेखीव, दणकट शरीराने फारतर फार लढाई करता येईल किंवा नट होता येईल. आतून अभिनय येत नसला, तर अशा आकर्षक शरीराचा झगमगाट करून सामान्य प्रेक्षकाला दिपवून टाकता येतं.पण सैनिक आणि नरांपुढे कोण काय करील अशा शरीरांचं.चांगली कविता लिहायची झाली तर डोळयांखाली सोसून कमावलेली काही काळी वर्तुळं हवीत आणि पोटाला एकदोन प्रेमळ वळया.
पुरुषापुरुषांना एकत्र ठेवलं आणि बायाबायांना वेगळं तर `शारीरिक व्याभिचार' टळतील हा बालिश विचार जगात सगळीकडे चालू असतो. योग्य उपाययोजना करून जमिनीवरचं जग आपापल्या व्यवहारात दंग आहे. कामाची पळापळ, वेग, वाहनं हाका, जेवा, धुवा, धावा या सगळयांत; पण इथे जमिनीच्या पोटात चालू आहे मंगळवार. नियमाप्रमाणे फक्त पुरुषांचा वार.उंच पायऱ्यांवर वरच्या कोपऱ्यात दोन शरीरं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. एकमेकांची चव घेत. त्यांच्या सगळया हालचालीत एक सवय आणि साधेपणा दिसतोय. काही वेळाने हळूच एकामागून एक असे ते दोघे तलावात शिरतात आणि तलावाच्या समोरासमोरच्या काठांवर रेलून एकमेकांकडे एकटक बघत राहतात.मी त्यांच्या नात्याची एक कथा माझ्या डोक्यात जुळवायला लागतो. वरच्या जगात कपडे घालून ते कोण असतील? त्यांची नावं काय असतील? ते एकमेकांना पहिल्यांदा कसे भेटले आणि कधी प्रेमात पडले? कुणी कुणाला पहिल्यांदा सांगितलं? कोण घाबरलं? कोण वैतागलं? कुणी समजावलं? आज सकाळी इथे यायचं त्यांनी कसं ठरवलं असेल?माझ्या मागे एक थुलथुलीत म्हातारा माणूस एका कोवळया तरुण मुलाकडून स्वत:ला गोंजारून घेत आहे. सारखा त्याच्या मिठीत शिरून हळू आवाजात त्याच्याशी बोलतोय. त्या तरुण मुलाची नजर तिसरीकडेच आहे. नजरेत एक निर्विकार भाव. त्यांच्या एकत्र असण्यातून त्यांच्यातला रोख व्यवहार लख्खपणे दिसतो आहे. मग दिसतात त्या दोघांची एकत्र आलेली शरीरं आणि उसनं सुख मागून समाधान मानणाऱ्या त्या म्हाताऱ्याचा केविलवाणा चेहरा. ही कथा मनात खरं तर वेगळयानं रचायची गरज नाही; पण ही माणसं आपापल्या माणसांत असतील तेव्हा काय आणि कशी असतील? शरीरासाठी पैसा आणि पैशासाठी शरीर या पलीकडे असलेली त्यांची आपली माणसं आत्ता या क्षणी जमिनीवर काय करत असतील?या दोन्ही जोड्यांकडे खास बघण्यासारखं काही नाही ह्या भावनेने बाकी सगळे आपापल्या एकेका कोषात. मी मान वर करून घुमटापलीकडे दिसणाऱ्या आकाशाकडे बघत पाण्यात तरंगत राहतो. मी पुन्हा जमिनीवर जाईन तेव्हा बरीच वर्षं उलटून गेलेली असतील.सवय आणि पूर्वकल्पना नसताना आपल्यासमोर बदादा काही ओतलं गेलं की काही वेळाने उत्सुकता आणि ताण ओसरतात. एका शांत अंतराने मी सगळया शरीरांकडे बघायला लागतो. ही विरक्तावस्था नाही. झाडांकडे एकटक बघावं तशी शरीरं दिसायला लागतात. इथे येण्यापूर्वी माझ्या शरीरावर मीच तयार केलेल्या एका ओराखड्याकडे मी बराच वेळ बघत राहतो.आता शरीराला एक हलकं शैथिल्य वेढून टाकतं. नखांचे कोपरेकोपरे स्वच्छ होऊन ती पांढरीफटक होतात आणि माझ्या मानेवर उन्हाचा एक दाट झोत गरम वर्तुळ तयार करतो.मी इकडेतिकडे बघतो. विल्यम कुठेही दिसत नाही. मी तलावातून बाहेर पडून पुन्हा कपडे बदलायच्या खोलीकडे चालायला लागतो.वरती अख्खं शहर धावतंय. अंगभर कपड्यांत. असंच चालत चालत वर जाता येणार नाही.आत्ता मी जे सगळं अनुभवलं ते सांगता येणं कठीण आहे. नीट लिहून काढायला पाहिजे. मराठीत लिहू? शरीरव्यवहार आणि प्रेम याविषयी माझ्या मातृभाषेत बोलायची सवय मी घालवून बसलो आहे. कपड्यांच्या आत लपवलेल्या अवयवांची नावं मी मराठीत घेत नाही आणि शारीरिक प्रेमाचं दीर्घ वर्णन इंग्रजीचा आधार घेतल्याशिवाय मला करता येत नाही. माझ्या आज्यांच्या तोंडी म्हणी आणि शिव्यांमधले असलेले कुल्ले वगैरे शब्द मी बोलताना संकोचतो. शिव्या तर बिचाऱ्या परागंदा झाल्या आहेत. जुने शब्द टाकून देऊन नव्या शब्दांची भर न घालणारी माझी पिढी. मराठीतलं शारीरिक वाङ्मय मला संस्कृताळलेलं वाटतं, आणि वृषण, वीर्य, योनी सारखे शब्द जीवशास्त्रीय. त्यांचे बोलीभाषेतले समानार्थ परीटघडीच्या शहरात शिवराळ मानले जातात. मग या उदंड नागडेपणाविषयी मी कसं लिहू?मी अंग पुसून एकामागून एक कपडे चढवतो. अत्यावश्यक मग आवश्यक मग अनावश्यक. पाय बुटात अडकवून त्याच्या नाड्या करकचतो. मनगटाला घड्याळ आवळतो आणि कमरेला पट्टा. आणि सगळं नीट लपवून, निस्तरून साळसूदपणे वरच्या जगाच्या पायऱ्या चढायला लागतो.ह्नह्नह्न